महाराष्ट्र मंडळाचा नेदरलँड्सचा गणेश उत्सव सलग तिसऱ्या वर्षीहि जल्लोषात !

श्रावण महिना सरत होता. पाऊस पडून सर्व सृष्टी हिरवीगार झाली होती. समृद्धीचे प्रतिक असलेला हिरवा रंगबघताना भाद्रपदाचे वेध लागण्याची चाहूल निर्माण झाली. ह्या अश्या मंगलमय वातावरणात गणपतीच्या आगमनाचे वेध आम्हा नेदरलँड् वासियांनाहि लागले यात नवल ते काय ! आणि मग सलग तिसऱ्या वर्षी नेदरलँड्स च्या ‘महाराष्ट्र मंडळाने’ गणपती उत्सव साजरा केला. विघ्नहर्ता गणेश हा गणपती आणि गुणपती पण असतो म्हणूनच त्या गुणांची पूजा करताना आम्ही आमच्यातल्या विविध कलागुणांना वाव देण्याचे ठरवले आणि मग काय … एकमेकांच्या कल्पनेतून ह्या वर्षी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ साकारण्याचे ठरले. आपल्या पुढच्या पिढीला सामवून घेत त्यांना आपल्या महाराष्ट्राची आणि संस्कृतीची ओळख करून देणे हेच यामागचे उद्दिष्ट होते. दोन तीन महिन्यांपासून मिरवणुकीच्या तयारीसाठी आणि कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सगळेच अथक परिश्रम घेत होते, त्यासाठी एक समितीच नेमण्यात आली होती. आणि तो दिवस उजाडला.

दिनांक ६ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी एक वाजल्यापासून स्वयंसेवकांची लगबग सुरु झाली. संस्कार भारतीची काढलेली अप्रतिम रांगोळी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. प्रवेशद्वारात अत्तराच्या सुवासाने लोकांचे स्वागत होत होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भगवे फेटे , पांढरे झब्बे परिधान केलेल्या पुरुषांचे लेझीम पथक , झांजा , ढोल , ताशे ह्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत फुलांनी सजवलेल्या पालखीतून झाले. मिरवणुकीमध्ये लहान मुलांबरोबरच आपल्या नातवंडांकडे आलेले आजी-आजोबाही मोठ्या कौतुकाने सामील झाले होते. आपल्या नातवंडना दूरदेशी हि मिरवणुकीचा अनुभव घेता येतो आहे याचे समाधान आणि कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यथासांग पूजा झाल्यावर जल्लोषात आरत्या म्हणण्यात लहान मुलांचाहि समावेश होता. त्यावेळी आवर्जून उपस्थित असलेले श्री. विनय चोबे (Counselor & Director of Ghandhi Centre, India ) आणि श्री आर. एस. राना (Asst. Counselor Officer, Indian Embassy) ह्यांनी हि गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले आणि विविध गुणदर्शनाला सुरूवात झाली. दोन

छोट्या मुलींनी सादर केलेल्या गौरी नंदनेनंतर गणनायकाय गुणवंदिताय ह्या गाण्यावर दीपनृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर हत्तीचे शेपूट हरवले त्या बालनाट्यातून मुलांनी आपली कला सदर केली. अशी चिक मोत्याची माळ ह्या गाजलेल्या गणपतीच्याच गाण्यावर छोट्या मुलींनी मोठ्या आत्मविश्वासाने नाच सदर केला. झाशीची राणी, बाजीराव पेशवे , पंढरीचा वारकरी , किर्तनकार , सावित्रीबाई फुले मराठमोळी मुलगी अश्या महाराष्ट्रातील महत्वाच्या व्यक्तीमत्वांवर लहानग्यांची वेशभूषा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. ‘भागले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ लहान मुलांच्या तोंडून ऐकताना पालक ‘जाहले सारेच धन्य ऐकतो मराठी’ चा उत्कट अनुभव घेत होते आणि यातूनच सर्वांचीच मातृभूमीशी अजूनही नाळ जोडली आहे या विचारांनी सुखावत होते. कोळीगीत, गणेश चालिसा, म्हणींवर आधारित नाट्यछटा, लावणीचा ठसका, मंगळागौरीसारखे पारंपारिक खेळ, समाजातल्या अंधश्रद्धेबाबत लोकांना जागरूक करणाऱ्या भारुडाचे विडंबन शैलीतले social media च्या आहारी गेलेल्या लोकांना जागरूक करणारे स्वलिखित भारुड आणि सर्वात शेवटी देवीचा गोंधळ अश्या भरगच्च कार्यक्रमांचा समावेश लोकधारेत होता. सरतेशेवटी काही स्थानिक गायकांनी गायलेल्या पाच गाण्यांनी कार्यक्रमाला चार चांद लागले . अस्सल मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेमधून केलेल्या सूत्रसंचालनकरण्याचा भार हि अतिशय यशस्वीरित्या पेलण्यात आला होता. त्यानंतर अर्थातच सुग्रास भोजनाचा आस्वाद घेणे क्रमप्राप्तच होते. गणपती उत्सवासारखा सण साजरे करून मातृभूमीशी नाळ जोडण्याचा आम्ही नेदरलँड्सवासियांनी प्रयत्न केला आणि ह्या सर्व गोड स्मृती मनाच्या मंजुषेत जपत सर्वजण ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत आपापल्या घरी परतले.

– पूर्वा कोरडे